। जळगाव । दि.10 जुलै 2022। किरीट सोमय्या यांना भारतीय जनता पक्षाने सांभाळलं पाहिजे. सोमय्या हे सतत ठाकरे परिवारावर टीका करत आहेत.
आजही ठाकरे परिवार आमचं दैवत असून पुन्हा आम्हाला काही दुसरा विचार करायला भाग पाडू नका, असा कडक शब्दात इशारा आमदार किशोर पाटील यांनी सोमय्यांना दिला आहे.
शिवसेनेसह अपक्ष अशा ५० आमदारांच्या बंडानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. त्यानंतर शिंदे गट व भाजपने एकत्र येत सरकार स्थापन केले आहे. मात्र, आम्ही आजही शिवसेनेतच आहोत, असे अनेकदा बंडखोर आमदार सांगत आहेत.
यासोबत ठाकरे व शिवसेनेबद्दल टिका सहन केली जाणार नसल्याचेही याआधीच त्यांनी भाजपला सांगितले आहे, अशी माहितीही बंडखोरांनी दिलेली आहे. मात्र यानंतरही किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंबद्दल ट्विट केले आहे. त्यामुळे बंडखोर आमदारांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे यांचे माफिया सरकार असा उल्लेख यात केला होता. यानंतर बंडखोर आमदारांनी याला विरोध केला आहे. यावर आता शिंदे गटाचे पाचोरा येथील आमदार किशोर पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामुळे शिवसेनेची आज ही अवस्था झाली आहे.
शिवसेनेसारखी भाजपची अवस्था होऊ द्यायची नसेल तर किरीट सोमय्यांना आवरलं पाहिजे, असे मत शिंदे गटातील आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केले आहे.
यापुढे आता सोमय्या यांची भूमिका काय रहाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जर सोमय्या यांनी टीका करणे सुरु ठेवले तर राज्यात पुन्हा सरकार अस्थिर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
--------------
👉 अमरनाथला ढगफुटीमुळे दरड कोसळून दुर्घटना ; अहमदनगरचे यात्रेकरून सुखरूप
👉 केंद्राच्या भक्कम पाठिंब्याने राज्याचा विकास साधणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Tags:
Breaking