वडिलांच्या दशक्रिया विधीनिमित्त समाजोपयोगी उपक्रम राबवून तरुणाने उभा केला नवीन आदर्श

लाडजळगावमध्ये रक्तदान शिबीर संपन्न
 
बोधेगाव, (दि.20 सप्टेंबर) :  कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे संपुर्ण भारतवर्ष संकटात आहे. त्यासाठी उपाययोजना म्हणुन केलेल्या लाँकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आली. कोरोना संसर्गाच्या कारणास्तव रक्तदान शिबीरे बंद होती. त्यामुळे मधल्या काळात महाराष्ट्रातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा होता. ही बाब लक्षात घेऊन समाजभान जपणार्‍या गोरक्ष दराडे या तरुणाने वडिलांच्या दशक्रिया विधीनिमित्त रक्तदान शिबीर राबवून समाजहितासाठी काळ व वेळेची मर्यादा नसते हे दाखवुन दिले. स्वतःवर दुःखाचा डोंगर कोसळला असताना वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ राबवलेल्या या समाजोपयोगी उपक्रमाचे परिसरातुन कौतुक होत आहे.


अंबादास दत्तू दराडे एक अत्यंत गरीब माणूस पण आपल्या माणुसकीने आणि स्वभावाने श्रीमंत असलेलं एक व्यक्तीमत्व  8 सप्टेंबर रोजी आपल्या दैनंदिन शेती कामात असताना त्यांना हर्ट अटॅक आला आणि होत्याचे नव्हते झाले. 3 मुलींचे लग्न आपल्या काबाडकष्टाच्या जोरावर करून पार पाडले. त्यांना असलेल्या 2 मुलांना कुठंतरी आपल्या डोळ्यासमोर केलेल्या कष्टाचे चीज होताना पाहायचे होते आणि मुलेही नगरला अभ्यास करण्यासाठी होते. 
 
 
वडील शेती काम करून आपल्याला अभ्यास करण्यासाठी इथे ठेवतात, त्याची जाणीव ठेवून मोठा मुलगा गोरक्ष हा एका सामाजिक संस्थेत काम करत असे. परंतु अचानक कोरोना आला आणि त्यांना गावी यावे लागले. कसली भरती नाही घरी शेती काम आणि कुठंच नोकरीची आशा दिसत नाही अशात वडिलांच्या आशा जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली. परंतु वडिलांचा मनमोकळा स्वभाव आणि सामाजिक कार्य करण्याची संधी न सोडणारा मुलगा यांनी त्यांच्या दशक्रिया विधीला रक्तदान शिबीराचे आयोजन केले.


पन्नास तरुणांनी या शिबीरामध्ये रक्तदान करुन सामाजिक बांधिलकी जपली. जय भगवान मित्र मंडळाच्या सौजन्याने या शिबीराचे आयोजन केले होते. हे यशस्वी करण्यासाठी मित्र मंडळ आणि नातेवाईक यांचे मोलाचे योगदान लाभले. या शिबीरासाठी आनंदऋषीजी ब्लड बँक, अहमदनगर यांचे विशेष सहकार्य लाभले. अशा प्रकारचा हा खेड्यातील पाहिलाच प्रयोग होता आणि त्याला उत्तम प्रतिसाद लाभला. असेच कार्य आणखी घडो.

Post a Comment

Previous Post Next Post