नगर शहरातून जाणार्या विविध महामार्गांवरील खड्ड्यांच्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. नेप्ती नाका ते कल्याण महामार्ग रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. रस्ते खराब झालेले असून देखील आपण व आपल्या अखत्यारीतील अधिकार्यांनी याबाबत कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा प्रयत्न आपण करत आहात, असे म्हणत महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कान टोचले आहेत. 15 दिवसात रस्ते दुरुस्त न झाल्यास अधिकार्यांना दालनात बसू देणार नाही, तसेच कोणत्याही क्षणी काळे फासले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
महामार्गांच्या दुरावस्थेप्रकरणी महापौर वाकळे यांनी आक्रमक भूमिका घेत अधीक्षक अभियंत्यांना पत्र धाडले आहे. शहरातून जाणार्या मनमाड ,पुणे, औरंगाबाद, सोलापूर , कल्याण महामार्गावरून मोठ्या प्रमाणात रहदारी असते. सदर महामार्ग हे शहरातून जात असल्याने शहरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या चारही महामार्गावरील रस्ते अत्यंत खराब झालेले आहेत.
कल्याण मार्गे शहरातून जाणारा उड्डाणपुलापासून नेप्ती नाक्यापर्यत रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले आहेत. या भागामध्ये मोठी लोकवस्ती आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदरचे रस्ते तातडीने दुरूस्त होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हंटले आहे.