मराठा आरक्षणासंदर्भात ८ दिवसात अध्यादेश काढा;
अन्यथा जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या घरावर मोर्चे
मराठा आरक्षणासाठी मराठा महासंघ
व शेतकरी मराठा महासंघ आक्रमक
नगर, (दि.13 सप्टेंबर) : मराठा आरक्षणासाठी संपुर्ण राज्यात निघालेले लाखोंचे मोर्चे व बलिदान व्यर्थ जाणार नाही. आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली असताना, राज्य सरकारने येत्या आठ दिवसात मराठा आरक्षण संदर्भात अध्यादेश काढावा अन्यथा जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला.
अहमदनगर येथील शासकीय विश्रामगृह येथे रविवारी मराठा आरक्षण संदर्भात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी अ.भा.मराठा महासंघ व शेतकरी मराठा महासंघाच्या पदाधिकार्यांची झुम अॅपवर ऑनलाईन बैठक पार पाडली. या बैठकीत शाम पवार, विजय काळे, मधुसूदन चौधरी, दिलीप थोरात, संतोष पागिरे आदींनी प्रश्न उपस्थित केले.
यावेळी उत्तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गवांदे, दक्षिण जिल्हाध्यक्ष बिभीषण खोसे, सचिव सुनील चौधरी, रावसाहेब मरकड, संघटक पै. नानासाहेब डोंगरे, भाऊसाहेब वाकचौरे, ज्ञानेश्वर फसले, जिल्हा उपाध्यक्ष विकास नरवडे, बाळासाहेब कोकाटे, अनिकेत कराळे, सतीश पठाडे, संतोष हंबरे, सुनील निमसे आदी उपस्थित होते. तर राज्यासह जिल्ह्यातील व तालुक्यातील पदाधिकार्यांनी ऑनलाईन बैठकीत सहभाग नोंदवला.
पुढे दहातोंडे म्हणाले की, मराठा आरक्षण हा समाजाच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून, मराठा आरक्षणला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली अन मराठा समाज पेटून उठला आहे. मराठा क्रांती मोर्चा च्या माध्यमातून 52 मोर्चे काढले, तर 50 समाज बांधव यांनी बलिदान दिले आहे. मराठा समाजाला मिळालेले आरक्षणला न्यायालयात महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदारपणामुळे स्थगिती मिळाली आहे.
राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत गंभीर नाही. हे आज पुन्हा एकदा न्यायालयात स्पष्ट झाल आहे. आता 11 वी व 12 वी ची प्रवेश प्रक्रिया सुरू असून, ह्यात अनेक प्रवेश झाले आहेत. मात्र, आता अडचणी निर्माण झाल्या आहेत. तरी अध्यादेश त्वरित काढावा असे दहातोंडे यांनी बैठकीत स्पष्ट केले. बैठकीचे प्रास्तविक भाऊसाहेब वाकचौरे यांनी तर आभार सचिव सुनील चौधरी यांनी मानले.